नवी दिल्ली : ब्रिटीशकाळात सुरु झालेल्या भारतीय रेल्वेला आज १६३ वर्ष पूर्ण झाली आहेत. १६ एप्रिल १८५३ रोजी आशिया खंडातील पहिली रेल्वे मुंबईच्या बोरीबंदर ते ठाणे मार्गावर धावली होती. या दिवशी सिंध, सुलतान आणि साहिब या तीन इंजिनाद्वारे धावणारी ही ट्रेन दुपारी ३ वा. ३५ मिनिटांनी बोरीबंदरवरुन निघून सव्वा तासात ठाण्यात पोहचली होती. या ऐतिहासिक क्षणाला १६३ वर्षे पूर्ण झाली आहेत. गेल्या १६३ वर्षात रेल्वेत अनेक बदल झाले. नव्या वर्षात पदार्पण करताना भारतीय रेल्वेची वाटचाल आधुनिकीकरणाकडे होत आहे. भारताच्या आर्थिक, लष्करी, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रात क्रांतीकारी बदल घडवण्यात देशाच्या या लाइफलाईनचा सिंहाचा वाटा आहे.