
नवी दिल्ली – मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी (एमएनपी) ला सुरुवात होऊन पाच वर्ष झाल्यामुळे ग्राहकांना ज्याप्रमाणे मोठा फायदा मिळत आहे. तसाच फायदा कंपन्यांनाही होताना दिसत आहे. यामध्ये आयडिया, व्होडाफोन आणि भारती एअरटेल या कंपन्या आघाडीवर असून रिलायन्स कम्युनिकेशन, एअरसेल आणि टाटा यांना सर्वात जास्त नुकसान झाले आहे.
आयडिया, व्होडाफोनला एमएनपीमुळे सर्वाधिक फायदा
आयडियाला जानेवारी २०१६ पर्यंत १.७ कोटी पोर्ट-इन्ससह सर्वात जास्त नफा झाला आहे. शहरासह ग्रामीण भागात आयडियाची सेवा उत्तम असल्याने ग्राहकांनी त्यांना मोठी पसंती दिली आहे. मात्र खराब सेवा देणा-या आरकॉम (रिलायन्स), एअरसेल आणि टीटीएसला ग्राहकांनी नाकारले आहे. या स्थितीतही ग्रामीण भागामध्ये मोठय़ा प्रमाणात सेवा देणा-या बीएसएनलची स्थिती अतिशय उत्तम राहिली आहे.
एमएनपी सुविधा जानेवारी २०११मध्ये दाखल झाल्यानंतर भारती एअरटेल, व्होडाफोन आणि आयडिया सर्वात जास्त फायद्यामध्ये राहिल्या आहेत. ट्रायच्या आकडेवारीनुसार, या दरम्यान १.७ कोटी पोर्ट-इनसह आयडिया टॉपवर राहिली आहे. तर व्होडाफोन १.११ कोटीसह दुस-या स्थानावर आणि भारती एअरटेल ७३ लाख पोर्ट-इनसह तिस-या स्थानावर राहिली आहे.
