भारतातील मधुमेहाचे प्रमाण वरचेवर वाढत चाललेले आहे. मधुमेह हा सुखासीन आणि बैठी कामे करणार्या लोकांना होत असतो असा आपल्याला समज आहे. भारतात तर गरिबी उदंड आहे. तेव्हा भारतात मधुमेहींची संख्या फार वाढायची नाही असे आपण समजून चालतो. प्रत्यक्षात मात्र मधुमेेह आणि हृदयविकार या दोन्हींच्या बाबतीत हा अंदाज चुकत आहे आणि भारता या दोन्ही विकारांचे प्रमाण वेगाने वाढत आहे. इसवी सन २००० मध्ये भारतात मधुमेहींची संख्या ३ कोटी २० लाख होती. २०१३ साली ती ६ कोटी ३० लाखांवर गेली. म्हणजे १३ वर्षात भारतातल्या मधुमेहींची संख्या जवळपास दुप्पट झाली.
वाढीची ही गती अजुनही कायम राहणार आहे आणि पुढच्या १५ वर्षात ती १० कोटींवर जाऊन पोहोचणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेने हा अंदाज व्यक्त केला आहे. मधुमेहाचे देशाच्या विकासावर गंभीर परिणाम होतात. कारण मधुमेहींची कार्यक्षमता कमी झालेली असते. विशेषज्ञांच्या मते भारतात मधुमेही लोकांवर वैद्यकीय उपचार करणार्यांसाठी दीड लाख कोटी रुपये खर्च होत असतात. सरकार मात्र त्यासाठी केवळ ३२ हजार कोटी रुपये राखून ठेवत असते. दीड लाख कोटींचा आता होणारा खर्चही दर वर्षी १५ टक्क्यांनी वाढतो. पण सरकारची तरतूद काही १५ टक्क्यांनी वाढत नाही. त्यामुळे मधुमेही व्यक्ती इतर आजारांनाही सहजी बळी पडतात.