
नवी दिल्ली – केंद्र सरकारने छोट्या-छोट्या बचतीच्या माध्यमातून पैसे जमविणाऱ्या मध्यमवर्गीयांना मोठा धक्का दिला असून सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी (पीपीएफ), तसेच किसान विकासपत्र यांसारख्या योजनांवर मिळणाऱ्या व्याजदरात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने कपात केली आहे.
मध्यमवर्गीयांचे कंबरडे केंद्र सरकारने मोडले
पीपीएफवरील व्याजदर ८.७ टक्क्यांवरून ८.१ टक्क्यापर्यंत खाली आणण्यात आला आहे. किसान विकासपत्रावरीलही व्याजदर कमी करण्यात आले असून आतापर्यंत किसान विकासपत्रावर वार्षिक ८.७ टक्के व्याज देण्यात येत होते. आता त्यावर वार्षिक ७.८ टक्के व्याज देण्यात येणार आहे.
त्याशिवाय पाच वर्षांच्या कालावधीसाठी गुंतवणूक केल्या जाणाऱ्या राष्ट्रीय बचतपत्रावरील व्याजदरही सरकारने कमी करून ८.१ टक्क्यांवर आणण्यात आले आहे. दोन वर्षांच्या मुदत ठेवीवरील व्याजदर ८.४ वरून ७.२ टक्के; तर टपाल कार्यालयातील ३ वर्षे मुदतीच्या ठेवींवरील व्याजदर ८.४ वरून ७.४ टक्क्यांवर आणले आहे. टपाल कार्यालयातील एक वर्ष कालावधीच्या मुदत ठेवीवरील व्याजदर ८.४ टक्क्यांवरून ७.१ टक्के असे करण्यात आले आहे.
