बद्री केदार मंदिर समिती ट्रस्टने केदारनाथाच्या दर्शनाला येणार्या भाविकांना दर्शनानंतर प्रसाद म्हणून शिवलिंग देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठीची तयारी सुरू केली गेली आहे. शिवलिंग ठेवण्यासाठी छोट्या डब्यांची ऑर्डरही दिली गेली असल्याचे समजते.
केदारनाथचे मु्ख्य कार्यकारी अधिकारी बी.डी सिंग म्हणाले की केदार दर्शनाला येणार्या भाविकांना आत्तापर्यंत लाडू, भस्म व गंगाजल प्रसाद म्हणून दिले जात होते. त्याबरोबरच आता शिवलिंगही दिले जाणार आहे. यामुळे स्थानिक लोकांच्या कमाईत वाढ होईल व रोजगार निर्मितीही होईल. सध्या पाच लाख शिवलिंगे व त्यासाठीच्या डब्या तयार करण्याची ऑर्डर दिली गेली आहे. शिवलिंग प्रसादात दिले गेले तर येथे येणार्या भाविकांची संख्या वाढेल असाही विश्वास मंदिर समिती ट्रस्टला वाटतो आहे. २०१३ साली आलेल्या प्रलयंकारी संकटानंतर येथे येणार्या भाविकांची संख्या घटली असल्याचेही सांगितले जात आहे.