नवी दिल्ली : ५३० आवश्यक औषधांच्या किमतींची मर्यादा केंद्र सरकारद्वारे निश्चित करण्यात आल्यानंतर १२६ औषधे ४० टक्क्यांपर्यत स्वस्त झाली आहेत. याविषयीची माहिती संसदेला देण्यात आली.
५३० औषधांची कमाल किंमत मर्यादा नॅशनल फार्मास्युटिकल प्रायसिंग अथॉरिटीने निश्चित केली आहे. ज्या ५३० औषधांची कमाल किंमत निश्चित झाली आहे, त्यातील १२६ औषधांच्या किमतीत ४० टक्क्यांपेक्षा अधिक घट झाली आहे. तर ३४ औषधै ३५ ते ४० टक्क्यांपर्यंत स्वस्त झाल्याचे रसायन आणि खत राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी राज्यसभेत सांगितले. औषधांच्या किमतवर नजर ठेवणा-या संस्थेने २६ औषधांच्या किमती ३० ते ३५ टक्के तर ४९ औषधांच्या किमती २५ ते ३० टक्क्यांनी कमी केल्या आहेत. ६५ औषधांच्या किमती २० ते २५ टक्क्यांनी कमी झाल्या, तर ४३ औषधे १५ ते २० टक्क्यांनी स्वस्त झाल्याचे अहिर यांनी सांगितले. ५७ औषधांच्या किमतीत १० ते १५ टक्के, ५० औषधांच्या किमतीत ५ ते १० टक्के तर ८० औषधांच्या किमतीत ० ते ५ टक्क्यांपर्यंत घट झाल्याचे अहिर यांनी म्हटले.