नवी दिल्ली – लोकांनी मोठ्या प्रमाणात ‘फ्रिडम २५१ ’ या स्वस्तात मिळणार्या स्मार्टफोनसाठी मागणी नोंदविल्यानंतर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) कंपनीच्या खात्यांची चौकशी सुरू केली आहे. तर दुसरीकडे रिंगिंग बेल्स कंपनी आपल्या ३० हजार ग्राहकांचे पैसे परत करण्याच्या तयारीत आहे.
कंपनीच्या खात्याची आणि व्यवहाराची ईडी चौकशी करीत असली, तरी यासंबंधात कंपनीला नोटीस पाठविण्यात आलेली नाही असे सूत्रांनी म्हटले आहे. केवळ २५१ रुपयात स्मार्टफोन देणारी ही कंपनी सध्या देशभरात चर्चेत आहे. आयकर विभागही नोएडा येथील कंपनीच्या व्यवहाराची चौकशी करीत असल्याचे वृत्त आहे. दूरसंचार कंपन्यांच्या संघटनांनी सरकारकडे कंपनीच्या व्यवहाराची चौकशी करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, कंपनीने ३० हजार ग्राहकांचे पैसे परत केल्याचे कंपनीचे मोहित गोयल यांनी म्हटले आहे.