नवी दिल्ली – गुगलचे चॅलेंज स्वीकारत जगाच्या सर्व प्रतिभेला यथांश कुलशेष्ठ या ११वीच्या विद्यार्थ्याने मागे टाकले आणि गुगल कोड-इन कॉन्टेस्ट जिंकले. फक्त ४९ दिवसांमध्ये गुगलचे ४० टास्क जयपूरच्या यथांशने पूर्ण केले.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील गुगलची ही स्पर्धा असून यात १२वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना सहभाग घेता येतो. यात गुगल आपले काही सॉफ्टवेअर बनविण्यासाठी कोडिंग करण्याचे काम या विद्यार्थ्यांना काही ठराविक दिवसात करण्यासाठी देते. ४९ दिवस गुगलची ही स्पर्धा चालते. ही स्पर्धा ७ डिसेंबरपासून २५जानेवारीपर्यंत आयोजित करण्यात आली. याचा निकाल ८ फेब्रुवारी जाहीर झाला. यात २७०० संगणक शास्त्राच्या विद्यार्थ्यांनी जगभरातून भाग घेतला होता. ९८ देशांमधून विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आले होते.
जयपूरचा यथांश राजस्थानचा पहिला आणि मागील ७ वर्षांमध्ये ही स्पर्धा जिंकणा-या मोजक्या भारतीय विद्यार्थ्यांपैकी एक आहे. त्याला जून २०१६रोजी अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामध्ये पुरस्कार स्वीकारण्यासाठी गुगल मुख्यालयात बोलाविण्यात आले आहे.