प्रदूषणामुळेच आशियाई देशात कर्करोगाची वाढ

cancer
नवी दिल्ली : वायुप्रदूषण सध्या कर्करोगाला कारणीभूत असून आग्नेय आशियामध्ये प्रदूषणामुळेच कर्करोगाच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) म्हटले आहे. जगातील २० प्रदुषित शहरांपैकी १४ शहरे आग्नेय आशियामध्ये आहेत, असेही त्यांनी सांगितले.

प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी या प्रदेशातील देशांच्या सरकारांना उपाययोजना करण्याचे सुचविण्यात आल्याचेही ते म्हणाले. तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनामुळे जगात कर्करोगाचे सर्वाधिक बळी जात आहेत, ही गोष्ट खरी असली तरी प्रदूषणामुळेही कर्करोगाचा विळखा वाढत चालल्याचे डब्ल्यूएचओने म्हटले आहे. डब्ल्यूएचओने आग्नेय आशियातील बांगलादेश, भूतान, उत्तर कोरिया, भारत, इंडोनेशिया, मालदिव, म्यानमार, नेपाळ, श्रीलंका, थायलंड या देशांतील सरकारांना प्रदूषणावर नियंत्रण आणण्याबाबत सुचविले आहे.

या प्रदेशातील अनेक शहरांमध्ये प्रदूषण वाढलेले आहे. त्यामुळे कर्करोगाच्या रुग्णांचेही प्रमाण वाढले आहे. त्यामुळे या प्रदेशात असलेल्या देशांच्या सरकारने ही समस्या तात्काळ सोडविण्याचे भान बाळगण्याची गरज आहे, असे मत आग्नेय आशियातील डब्ल्यूएचओच्या प्रादेशिक संचालक पूनम सिंग यांनी जागतिक कर्करोगदिनी सांगितले. ४ फेब्रुवारी हा जागतिक कर्करोग दिन म्हणून पाळला जातो. या भागातील व्यावसायिक धोका आणि पर्यावरणातील घटकांबाबत असणारी असुरक्षितता यामुळे कर्करोग आणि अकाली मृत्यू यांचे प्रमाण अधिक आहे.

सूर्याच्या प्रखर किरणांपासून कोणत्याही प्रकारचे संरक्षण नसलेली आणि विविध कंपन्यांमधील कर्करोगाला कारणीभूत असलेली रसायने यांमुळे या भागातील कामगारांमध्ये हा धोका अधिक बळावतो. त्यासाठीच कर्करोगावर होणा-या उपचार पद्धती आणि सेवा अखंडपणे सुरू ठेवताना कामगार वर्गाला त्या सेवांचा उपभोग घेता येईल अशा स्वरूपाची क्षमता उभारण्याची गरज आहे, असे पूनम सिंग यांनी सांगितले.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment