राजन यांचे कर्जबुडव्यांना खडे बोल

rajan
दोवास : बँकांकडून कर्ज घेऊन काही लोक पार्ट्या करतात. त्या पैशांचा विनियोग आवश्यक त्या कार्यासाठी करीत नसल्याचे खडे बोल रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी कर्जबुडव्यांसाठी काढले आहेत.

त्यांनी भरमसाठ कर्ज घेणा-या कंपन्यांनाही निशाणा केला आहे. जर तुम्ही मोठे कर्ज घेऊन पार्ट्या करीत असाल तर यामुळे लोकांमध्ये, समाजामध्ये चुकीचा संदेश जातो. नाहक खर्च करणे म्हणजे तुम्हाला कुणाचीही काळजी नाही, देणे-घेणे नाही, असाच हा प्रकार आहे. एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये राजन यांनी आपले परखड मत व्यक्त केले. राजन म्हणाले की, हा काही रॉबिन हुडसारखा प्रकार नाही. हा प्रकार समाजात चुकीचे काम करणा-यांशी संबंधित आहे. जर आपण मोठे कर्ज घेतल्यानंतरदेखील जन्मदिवसाच्या दिनी मोठ्या पार्टीवर नाहक खर्च करीत असाल तर यामुळे लोकांना वाटेल की, मला याची काही चिंता नाही. अशा वागण्यामुळे लोकांमध्ये चुकीचा संदेश जाईल.

देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकाचा एनपीए अशाच गोष्टींमुळे वाढत आहे. भारतीय अर्थव्यवस्थेला बँकांच्या वाढत्या एनपीएमुळे मोठे नुकसान होत आहे. मागील महिन्यात रिझर्व्ह बँकेने बँकांना मार्च २०१७ पर्यंत जी कर्ज वसुली प्रकरणे आहेत ती पूर्णत: वसूल करून खाते निरंक करण्यासाठी बँकांना अतिरिक्त अधिकार दिले जात आहेत. जूनच्या तिमाहीमध्ये ६.०३ टक्केचा आकडा वसुलीमध्ये पूर्ण करण्यात आल्याचेही राजन यांनी सांगितले. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा एनपीए जून २०१५ मध्ये एकूण कर्जाच्या ६.०३ टक्के झाला आहे. जो मार्च २०१५ मध्ये ५.२० टक्के होता.

ज्यांनी मोठे कर्ज घेतले आहे, त्यांन या कर्जाबाबत गंभीर राहिले पाहिजे. त्यांनी आपल्या खर्चात काटकसर केली पाहिजे आणि सार्वजनिकरित्या नाहक खर्च टाळला पाहिजे. राजन यांनी सांगितले की, रिझर्व बँक कर्जवसुलीसाठी बँकांसाठी एक प्रक्रिया तयार करीत आहे.भारतीय रुपयाच्या संदर्भात राजन म्हणाले की, विकसनशील देशाच्या तुलनेत भारतीय रुपयाची अवस्था ब-यापैकी आहे शिवाय त्यांनी नुकत्याच सुरू करण्यात आलेल्या स्टार्ट अप इंडिया आणि पीक विमा योजनेचेही कौतुक केले.