५० पौंड सोन्याची दहा लाख टाकाऊ मोबाईलमधून निर्मिती

mobile
नवी दिल्ली : आपल्यासाठी इलेक्ट्रॉनिक कचरा ही डोकेदुखी असली तरी हा कचरा काहींसाठी मौल्यवान ठरतो. आपण सोने, चांदीसाठी खाणकाम करतो, पण ई-कच-यातून हे मौल्यवान धातू मोठ्या प्रमाणात मिळतात असे एका वैज्ञानिकाने म्हटले आहे. १० लाख निकामी मोबाईलमधून साधारणत: ५० पौंड सोने व २० हजार पौंड तांबे मिळत असते; फक्त त्यासाठी त्या कच-यावर प्रक्रिया करावी लागते.

झेविएर स्कूल ऑफ मॅनेजमेंटचे प्राध्यापक प्रणबेश रे यांनी सांगितले की, ई-कच-यांचे व्यवस्थापन महत्त्वाचे असून वर्षांला जगात ६.४५ कोटी टन कचरा निर्माण होतो, त्यातील चाळीस टक्के कच-यावर प्रक्रिया केली जाते. भारताचा ई-कचरा निर्मितीत तिसरा क्रमांक आहे. भारतात २०१४ मध्ये १७ लाख टन ई-कचरा निर्माण झाला होता. ई-कच-याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे व तो पर्यावरणाचा मोठा प्रश्न आहे. सामान्य माणसे ई-कचरा निर्माण करीत असतात त्यांना त्याच्या विल्हेवाटीचे अजीबात गांभीर्यही नसते. जर हे असेच चालू राहिले तर ई-कच-याचा ढीग हा एम्पायर स्टेट बिल्डिंगसारख्या दोनशे इमारतींइतका होईल. माणसाच्या अनावश्यक गरजांमुळे ई-कचरा वाढतच आहे.

लोक दर वेळी आपला मोबाईल फोन बदलतात. केवळ कंटाळा आला म्हणून एक मोबाईल टाकून नवीन घेतला जातो. टाटा स्टीलचे श्रीकांत मोकाशी यांनी सांगितले की, इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे आयुर्मान वाढवणे आवश्यक आहे. एखाद्या उद्योगात ही उपकरणे निरुपयोगी झाली असतील तर ती दुसरीकडे वापरता येतील. मोबाईल फोन, लॅपटॉप यामुळे इ-कचरा वाढला. कबाडीवाल्यांना इ-कचरा हाताळण्याचे प्रशिक्षण नसते त्यामुळे पर्यावरणाचे प्रश्न निर्माण होतात. कबाडीवाल्यांना म्हणजे कचरा गोळा करणा-यांनाही प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. क्वीन्सलँड विद्यापीठाचे अँथनी हालाँग यांनी सांगितले की, इ-कच-यावर प्रक्रिया करणे पर्यावरणासाठी महत्त्वाचे आहे, कारण या कच-याने जागतिक तापमान वाढीची समस्या वाढली आहे.

Leave a Comment