तिरुपती – तिरुपती ते शिर्डी दरम्यान एक साप्ताहीक रेल्वे गाडी भाविकांच्या सुविधेसाठी सुरू करण्यात आली असून या गाडीला रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी हिरवी झेंडी दाखवून तिला रवाना केले. प्रभू यांनी यावेळी ही रेल्वे प्रवाशांच्या सुविधेसाठी मैलाचा दगड ठरेल अशी आशा व्यक्त केली आहे.
याप्रसंगी आयोजित एका कार्यक्रमात ते म्हणाले की, रेल्वे प्रशासनासाठी सामान्य नागरिक हा महत्वाचा घटक असून रेल्वेला त्याच्यापासून सर्वाधिक उत्पन्न मिळते. रेल्वेचे ‘दिलेले वचन पाळणे’ हे ब्रीदवाक्य असून प्रवाशांना गुणवत्तायुक्त सुविधा उपलब्ध करून देणे ही रेल्वेची जबाबदारी आहे, यावर सुरेश प्रभू यांनी जोर दिला. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत त्यांनी रेल्वेत स्वच्छता राखण्याचा मुद्दाही यावेळी स्पष्ट केला. तसेच रेल्वे विभागही या अभियानाचाच एक भाग असल्याचे सांगितले. तिकीट केंद्रावरील गर्दी कमी करणे, पेपरलेस तिकीटींगची सुविधा उपलब्ध करून देणे, ई-तिकीटची सोय, चांगल्या दर्जाचा प्रवास, रेल्वे डब्यातील अंतर्गत बदल या सर्व बाबी उत्कृष्ट रेल्वे सुविधांचे उदाहरण असल्याचेही ते म्हणाले.