
नवी दिल्ली- देशभरात आपले करीअर अर्ध्यावर सोडणाऱ्या महिलांची संख्या लक्षणीय असल्याचे एका नव्या सर्वेक्षणात दिसून आले असून या सर्वेक्षणात पांढरपेश्या वर्गातील महिलांच्या करीअरचा विचार करण्यात आला आहे.
कौटुंबिक कारणासाठी ४८ टक्के भारतीय महिलांना सोडावी लागते नोकरी
देशात ४८ टक्के करीअर अर्ध्यावर सोडणाऱ्या महिलांचे प्रमाण आहे तर आशियामध्ये ते २१ टक्के आहे. जर या महिलांनी आपले करीअरमध्येच सोडले नाही तर देशाच्या जीडीपीमध्ये दोन टक्क्याची वाढ होईल असे निरीक्षण या अभ्यासाचा आधार घेऊन मांडण्यात आले आहे. बहुतांश महिला आपले करीअर शिखरावर असताना सोडतात आणि त्याचे कारण हे आपल्या कुटुंबाला वेळ देणे हेच असते. भारतीय महिलांच्या आयुष्यावर इतर अनेक गोष्टींचा अधिकार असतो जसे की पालक, पती आणि सासरची मंडळी. त्यामुळे त्यांना आपले करीअर सोडावे लागते. असे चीफ कमर्शिअल ऑफिसर इप्सिता दासगुप्ता यांनी म्हटले. जर मोठ्या पदांवर महिला असतील तर निर्णय अधिक संवेदनशीलतेने घेतले जातात असे एचएसबीसीच्या अध्यक्षा नैना लाल किडवई यांनी म्हटले आहे. एखाद्या महिलेच्या करीअरमध्ये तिच्या सासूचेही मोठे योगदान असते ही गोष्ट सुद्धा किडवई यांनी अधोरेखित केले. करीअर आणि कुटुंब यामधून जर एक निवडायचे असेल तर महिला नेहमी प्राधान्य कुटुंबाला देतात असे त्या म्हणाल्या.
