नवी दिल्ली: मुंबई शेअर बाजाराने (बीएसई) जगात सर्वाधिक वेगवान स्टॉक एक्स्चेंज ठरल्याचा दावा केला आहे. या स्टॉक एक्स्चेंजने केवळ ६ मायक्रो सेकंदात व्यवहार पूर्ण करून हा मान पटकावला आहे.
आशियातील सर्वात जुने स्टॉक एक्स्चेंज असलेले मुंबई शेअर बाजार यापूर्वीच देशातील सर्वात वेगवान स्टॉक एक्स्चेंज ठरले आहे. आता ते जगातील सर्वाधिक वेगवान ठरले आहे; असे ट्विट मुंबई शेअर बाजाराचे कार्यकारी संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आशिषकुमार चौहान यांनी केले आहे. हाच दावा एक्चेंजनेही ट्विटरवर केला आहे.
सन २०१३ च्या अखेरीस ‘बीएसइ’ने ‘बोल्ट प्लस’ ही यंत्रणा व्यवहारांसाठी कार्यान्वित केली असून ती देशात सर्वाधिक वेगवान यंत्रणा आहे. या ट्रेडींग प्लॅटफॉर्मवर २०० मायक्रो सेकंदात व्यवहार पूर्ण होतो.
या यंत्रणेद्वारे ‘बीएसइ’चे ९०० ब्रोकर्स, १ लाख शाखाआणि लाखो गुंतवणूकदार आपले व्यवहार करीत आहेत.