सातवा वेतना आयोग लागू होत असल्याची चर्चा जोरात सुरू झाली असली तरी हे पे कमिशन सरकारी नोकरदारांच्या अपेक्षांवर पाणी पाडेल असे संकेत मिळत आहेत. पे कमिशन म्हणजे दणकून पगारवाढ असे आजपर्यंतचे गणित हे पे कमिशन चुकवेल असे खात्रीलायक सूत्रांकडून समजते. या पे कमिशनमध्ये पगारवाढ मिळेल पण ती १५ ते २० टक्के इतकीच असेल असेही सांगितले जात आहे. मात्र किमान वेतन ७७३० रूपयांवरून १५ हजारांवर नेले जाणार असल्याने सरकारी कर्मचार्यांना थोडा दिलासा मिळू शकेल असेही समजते.
सध्या सरकारी खजिना मोठी वेतनवाढ लागू करण्यासाठी पुरेसा सक्षम नाही. अर्थमंत्री अरूण जेटली यांनीही नुकतेच आर्थिक तूट नियंत्रणात ठेवण्यासाठी काही अप्रिय आणि कटू निर्णय घेणे सरकारला भाग असल्याचे सूतोवाच केले आहे.तसेच केंद्रीय कर्मचार्यांना जादा वेतन वाढ शक्य नसल्याचे यापूर्वीही संकेत दिले गेले आहेत. त्या पार्श्वभूमीवर सातवा वेतन आयोग सरकारी कर्मचार्यांच्या अपेक्षांवर पाणी टाकणारा असेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.