मोबाईल ‘कॉल ड्रॉप’ची ग्राहकांना मिळणार नुकसान भरपाई !

trai
नवी दिल्ली – मोबाईलधारकांना गेल्या काही काळात सातत्याने कॉल ड्रॉपच्या समस्येचा सामना करावा लागत होता. या समस्येवर लवकरच तोडगा निघण्याची शक्यता असून यासंबंधीचा एक प्रस्ताव भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) मांडला असून यामध्ये ग्राहकांना त्यांचा कॉल ड्रॉप झाल्यास नुकसान भरपाई देण्याची तरतूद करण्यात आली आहे.

संबंधित कॉलचे मुल्य ग्राहकांकडून न आकारणे किंवा मोफत कॉलिंग मिनिटे देणे असे या नुकसान भरपाईचे स्वरूप असू शकते. यासंदर्भात ‘ट्राय’ने एक पत्रक जारी केले असून त्यावर २८ सप्टेंबरपर्यंत लोकांकडून सूचना मागविण्यात येणार आहेत. कॉल सुरू झाल्यापासून पाच सेकंदांच्या आत ड्रॉप झाल्यास त्यासाठी भरपाई देऊ नये. मात्र, पाच सेकंदांनंतर कॉल ड्रॉप झाल्यास त्यासाठी भरपाई द्यावी, असे म्हटले आहे.

शेवटची पल्स ही भरपाई देताना गृहीत धरण्यात येऊ नये, असे पत्रकात म्हटले असून गेल्या काही काळात कॉल ड्रॉपची वाढती समस्या पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील ‘ट्राय’ला या प्रकरणाची दखल घेण्यास सांगितले होते. त्यानुसार ट्रायने हा निर्णय घेतल्याचे म्हटले आहे.