
वॉशिंग्टन – अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था असलेल्या ‘नासा’ने याच शतकाच्या अखेरपर्यंत समुद्राचा जलस्तर तीन फुटांनी वाढेल आणि मुंबई, न्यूयॉर्क व टोकियो यासारखी किनारपट्टीवरील शहरे समुद्रात बुडण्याचा धोका फार जास्त राहील, असा इशारा दिला आहे.
नासाचा इशारा; शतकाअखेर मुंबई, न्यूयॉर्क समुद्रात बुडणार
समुद्राच्या किनारपट्टीवर जगभरातील १५ महानगरांपैकी ११ महानगरे वसलेली असून, या सर्वच शहरांना समुद्राच्या जलस्तरातील वाढ धोकादायक ठरणार आहे, असे नासाने स्पष्ट केले. विशेष म्हणजे, विसावे शतक सुरू झाल्यानंतर समुद्राचा जलस्तर आठ इंचाने वाढला आहे. नासाच्या मते, बड्या उद्योगांमधून बाहेर पडणार्या कार्बनडायऑक्साईडचा ९० टक्के भाग समुद्रात जात असतो. यामुळे अलीकडील काळात वातावरणात अनेक मोठे बदल झाले आहेत. या बदलांमुळे पृथ्वीवरील बर्फदेखील अतिशय झपाट्याने वितळत आहे. समुद्राचा जलस्तर वाढण्याचा अर्थ समुद्राचे पाणी शहरांचा जो सखल भाग आहे, तिथे सर्वप्रथम घुसेल. त्यानंतर समुद्रात उठणार्या मोठमोठ्या लाटांमुळे पाणी शहरांच्या वरच्या भागांपर्यंत पोहोचेल.
यासारख्या कारणांमुळे समुद्र किनार्यावरील शहरांमध्ये पूरस्थिती निर्माण होऊन ही शहरे जलमय होतील. आतादेखील समुद्राच्या महाकाय लाटांमुळे या शहरांना दरवर्षी ६६ अब्ज रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. नुकसानीचा हा आकडा २०५० पर्यंत सहा ट्रिलियन डॉलर्सपर्यंत जाणार आहे, असेही नासाने म्हटले आहे.
