१४ बड्या मॉल्सना लागणार टाळे

cii
मुंबई : बड्या महानगरांमध्ये उभारल्या गेलेल्या जवळपास १४ मॉल्सना नजीकच्या काळात टाळी लागतील आणि सुमारे ३५ ते ४५ लाख चौरस फुटांचे बांधकाम वाया जाईल, अशी भीती स्थावर मालमत्ता क्षेत्रातील ताज्या प्रवाहांचा वेध घेणा-या भारतीय उद्योग महासंघ (सीआयआय) आणि जेएलएल या स्थावर मालमत्ता क्षेत्राविषयी संशोधन करणा-या संस्थेने संयुक्तपणे तयार केलेल्या अहवालाने निष्कर्ष मांडला आहे.

मुंबईत सीआयआयच्या पश्चिम विभागाकडून आयोजित स्थावर मालमत्ता परिषदेत, प्रकाशित करण्यात आलेल्या या अहवालाने स्थावर मालमत्ता क्षेत्रात मोठे संक्रमण नजीकच्या काळात घडून येत असल्याचे म्हटले आहे. अर्थात घडून येत असलेले हे बदल स्वागतार्हच असल्याचेही अहवालाचे मत आहे. आधुनिक किरकोळ विक्री क्षेत्रातील भाऊगर्दी कमी होऊन, वाईट अवस्थेत असलेले मॉल्स बंद होऊन, सुस्थितीत असलेल्या मॉल्सना आजच्या स्थितीत अत्यावश्यक असलेला वाव मिळवून देतील, असा अहवालाचा कयास आहे. या पाहणीतून आजच्या घडीला मोजकेच मॉल्स हे पूर्ण क्षमतेने सुरू असून, बहुतांश शहरातील मॉल्समधील रिक्त दालनांचे प्रमाण सरासरी २० टक्क्यांवर पोहोचल्याचे म्हटले आहे. वाईट कामगिरी असणा-या मॉल्सना टाळे लागत असून, काहींनी बांधून सज्ज केलेले बांधकाम पूर्णपणे पाडण्याचे, तर काहींनी ते कार्यालयीन जागांमध्ये रूपांतरित करण्याची तडजोड स्वीकारली असल्याचे हा अहवाल दर्शवितो. अनेक मॉल्समध्ये भाडेपट्टीचा कालावधी हा २ ते ५ वर्षांपर्यंत खालावला आहे.

Leave a Comment