देशभरातून मॅगी मागे घेण्याच्या प्रक्रियेस साधारण दोन महिन्यांचा काळ लागणार असल्याने नेस्ले इंडिया कंपनीने कर्मचार्यांना आणीबाणी असल्याशिवाय रजा मिळणार नाही असे आदेश जारी केले आहेत. ज्या कर्मचार्यांची सुट्टी पूर्वीच मंजुर झाली होती त्या सुट्टयाही रद्द करण्यात आल्या आहेत असे समजते. नेस्ले इंडियात ५ हजार कर्मचारी आहेत.
मॅगी नूडल्समध्ये आरोग्यास अपायकारक पदार्थ सापडल्याने देशभरातील सर्व दुकाने, खाद्यपदार्थ विक्री सेंटर्स मधून मॅगीची पाकिटे परत घेतली जात आहेत. या पाकिटांवर रिकॉल असा शिक्का मारला जाणार आहे. अन्न व औषध प्रशासनाने नेस्लेला मॅगीचे नवीन उत्पादन थांबविण्याचेही आदेश यापूर्वीच दिले आहेत. मॅगीची परत घेतली गेलेली पाकिटे कंपनी नष्ट करून टाकणार असल्याचेही सांगितले जात आहे.
देशात ६० लाख स्टो्अर्स, ३० लाख छोट्या इटरीज, वितरक आणि उपवितरकांकडून मॅगीची पाकिटे परत घेतली जाणार आहेत. त्यात ग्राहकांनी पूर्वीच खरेदी केलेल्या पाकिटांचा समावेश नाही. २०१४ मध्ये कंपनीने २५०,००० टन मॅगीचे उत्पादन विक्री भारतात केली आहे त्यातून वर्षात २५०० कोटींचा महसूलही कंपनीला मिळाला आहे. या महसूलात मॅगी नूडल्सचा वाटा ३१.५ टक्के असल्याचेही सांगितले जात आहे.