महाबळेश्वरला पर्यटकांची गर्दी

mahabaleshwar
सातारा : महाबळेश्वरमध्ये पर्यटकांचा मुख्य हंगाम सुरू झाला असून ऐन उन्हाळ्यात येथे झालेल्या वळवाच्या पावसाने ‘पर्यटक राजा’ चांगलाच सुखावला आहे. उन्हाळी हंगामात वातावरणात झालेल्या या बदलामुळे महाबळेश्वर पर्यटकांनी बहरून गेले असून मागील १५ दिवसांत सुमारे १० लाख पर्यटकांनी या पर्यटनस्थळाला भेट दिली आहे.

महाबळेश्वर हे पर्यटकांच्या पसंतीसाठी नेहमीच अग्रस्थानी असते. दरवर्षी लाखो देशी-विदेशी पर्यटक महाबळेश्वरला भेट देतात; परंतु पर्यटकांचा मुख्य हंगाम हा एप्रिल आणि मे महिना असतो. कडक उन्हाळ्यात महाबळेश्वरात पावसाचे वातावरण निर्माण होत आहे. एप्रिल महिन्यात किती तरी वेळा असे वातावरण पाहावयास मिळाले आहे. अशातच काही दिवसांपूर्वी झालेल्या वळवाच्या पावसामुळे वातावरणात बदल घडला आहे.

काही हौशी पर्यटकांबरोबरच स्थानिक नागरिकांनीही या पावसाचा आनंद लुटला. पर्यटकांचा उन्हाळी हंगाम सुरू झाल्याने येथील हॉटेल व्यावसायिक तसेच मुख्य बाजारपेठ पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे. महाबळेश्वरची खासियत असणा-या स्ट्रॉबेरीपासून ते जाम, जेली, चिक्की, चने अशा वस्तूंनी बाजारपेठ बहरून गेली आहे. पर्यटक दिवसभर येथील विविध ठिकाणी भेट देत आहेत. तर सायंकाळी नौकाविहारासाठी पर्यटकांची वेण्णा तलाव येथे गर्दी होत आहे. महाबळेश्वरसोबतच पाचगणीलाही पर्यटक मोठ्या संख्येने भेट देत असल्याचे चित्र आहे. एप्रिल आणि मे या महिन्यांत येथे पर्यटकांची संख्या सर्वाधिक असते. महाबळेश्वरला भेट देणा-या पर्यटकांमध्ये गुजराती पर्यटकांची संख्या अधिक आहे. या व्यतिरिक्त कर्नाटक, तमिळनाडू, पंजाब या राज्यांतूनही पर्यटक दाखल होत आहेत.

Leave a Comment