रत्नागिरी : पुन्हा कोकणपट्टीला अवकाळी पावसाने झोडपल्यामुळे आंबा-काजुच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर वीजेची तार अंगावर पडून विद्यार्थीनीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना चिपळूण येथे घडली.
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला अवकाळी पावसाने गुरूवारी संध्याकाळी पुन्हा झोडपले. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, खेड, गुहागरमध्ये पडलेल्या पावसामुळे रस्ते आणि शेतात पाणी साचले होते. ठिकठिकाणी झाडे कोसळल्याने वीजपुरवठाही खंडित झाला होता. अवकाळी पावसामुळे आंबा-काजू पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असुन, बागायतदार चिंतेत सापडले आहेत.
सरकारने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी आता बागायतदार करू लागले आहेत. तर चिपळूण शहरातील मापारी मोहल्ला येथे अवकाळी पावसामुळे वीजेची तार तुटून नववीतील विद्यार्थीनीवर पडल्याने, शॉक लागून तिचा मृत्यू झाला. शाईन फाईक असे या विद्यार्थिनीचे नाव आहे. तसेच तिला वाचवण्यासाठी गेलेल्या काका आणि काकू यांनाही शॉक लागला असून, त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे.