घटस्फोटाला कारणीभूत ठरत आहे सोशल मीडियावरील चॅटिंग !

chatting
मुंबई – पती-पत्नीच्या नात्यात सोशल मीडियावरून होणारे चॅटिंग, मोबाइलवरून बोलणे, सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळणारे प्रेमसंबंध अशा अनेक कारणांमुळे दुरावा निर्माण होत असल्याची धक्कादायक माहिती एका आकडेवारीतून समोर येत आहेत.

गेल्या वर्षभरात जिल्ह्यात घटस्फोटाची सुमारे ६०० प्रकरणे ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या आकडेवारीनुसार समोर आली असून, त्यापैकी निम्म्या प्रकरणात घटस्फोटासाठी ‘सोशल मीडिया’चे कारण पुढे करण्यात आले आहे. फेसबुक, ट्विटर, व्हॉट्स अ‍ॅप या ‘समाजमाध्यमां’मुळे संवाद वाढला असला, तरी या माध्यमांच्या अतिवापरामुळे कुटुंब व्यवस्थेतील संवाद संपत चालल्याचे दिसून येत आहे. सोशल मीडियाच्या आहारी गेल्याने पती-पत्नीच्या नात्यांत दुरावा निर्माण झाल्याच्या अनेक घटना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणासमोर आल्या आहेत.

घटस्फोट घ्यावा या मतांपर्यंत पोहोचलेल्या दाम्पत्यांचे समुपदेशन करून त्यांची मने जुळवण्याचे काम या प्राधिकरणामार्फत केले जाते. गेल्या वर्षभरात या प्राधिकरणाकडे सुमारे सहाशे घटस्फोटांची प्रकरणे आली. त्यापैकी ५५ ते ६० दाम्पत्यांचे यशस्वी समुपदेशन झाल्याने ते सुखाने नांदू लागले आहेत, अशी माहिती ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य आणि समुपदेशक अ‍ॅड. त्रिंबक कोचेवाड यांनी दिली.

लग्नात मानपान किंवा हुंडा दिला नाही, स्वयंपाक येत नाही, सासु-सासरे छळ करतात, अशा स्वरुपाची कारणे यापूर्वी पती-पत्नीच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण करण्यासाठी कारणीभूत ठरत होती. मात्र आता यात ‘सोशल मीडिया’शी संबंधित कारणेही वाढू लागली आहेत. गेल्या वर्षभरात प्राप्त झालेल्या सहाशे तक्रारींपैकी जवळपास निम्म्या तक्रारी या स्वरूपाच्या आहेत, अशी माहिती कोचेवाड यांनी दिली.

Leave a Comment