अहमदाबाद – सध्या स्वाइन फ्लूने देशभरात ८४१ जणांचा बळी घेतल्याची माहिती सरकारने दिली आहे. या रोगाची सुमारे १४ हजार ५०० जणांना लागण झाली असून, ही गंभीर बाब असल्याचे सरकारने म्हटले आहे.
आरोग्यमंत्री जे. पी नड्डा यांनी दोन्ही सभागृहात दिलेल्या माहितीनुसार २००९ मध्ये जो “एच1एन1‘चा जो विषाणू आढळला होता आताचा विषाणूही तसाच असून, त्यात बदल झाला नसल्याचे म्हटले आहे. २००९-१० मध्ये स्वाईन फ्लू प्रतिबंधासाठी “ओसेल्टामिव्हिर‘ हे औषध आताही परिणामकारक आहे. त्याद्वारेच रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
स्वाइन फ्लूचा वाढता प्रसार रोखण्यासाठी अहमदाबाद जिल्ह्यात कलम १४४ लागू करण्यात आले आहे. स्वाइन फ्लूच्या वाढत्या बळींची संख्या विचारत घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी अहमदाबाद जिल्ह्यात जमावबंदी लागू करण्याचे आदेश दिले.
अहमदाबादसह गुजरातमध्ये स्वाइन फ्लूची लागण झालेल्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते आहे. स्वाइन फ्लू हा संसर्गजन्य आजार असून, गर्दीच्या ठिकाणी श्वसनक्रियेद्वारे किंवा तोंडातून स्वाइन फ्लूच्या विषाणूचा प्रसार होतो. त्यामुळे जिल्ह्यात जमावबंदी लागू करण्याचा आदेश देण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. जानेवारी पासून गुजरातेत स्वाइन फ्लूमुळे २३१ पेक्षा अधिक जणांचे बळी गेले असून, त्यापैकी ५० पेक्षा अधिक बळी अहमदाबाद जिल्ह्यात गेले आहेत. या पार्श्वभूमीवर विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने होणारी लोकांची गर्दी टाळण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने जमाबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामधून लग्न सोहळे आणि अंत्ययात्रांना वगळण्यात आले आहे.