जयपूर – स्वाईन फ्लूने देशात सर्वत्र कहर केला असून एकट्या राजस्थानमध्ये स्वाईन फ्लूने सर्वाधिक बळी घेतले आहेत. राजस्थानात आतापर्यंत स्वाईन फ्लूने १९१ बळी घेतल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. राज्यात बुधवारी आणखी ८ जणांचा स्वाईन फ्लूची लागण झाल्याने मृत्यू झाला.
राजस्थानमध्ये बुधवारी ३४६ स्वाईन फ्लूचे संशयित रुग्ण आढळले. त्यामुळे हा आकडा ३ हजार ६४८ वर पोहचला. स्वाईन फ्लूचे लक्षण दिसताच डॉक्टरांचा तात्काळ सल्ला घ्यावा, असे आवाहन राजस्थानचे वैद्यकीय आणि आरोग्य- मंत्री राजेंद्रसिंह राठोड यांनी केले आहे. आतापर्यंत राजस्थानमध्ये ४६ लाख संशयितांची तपासणी करण्यात आली असून राज्यभरात १५ लाखांच्या वर टॅमी फ्लूच्या गोळ्या वितरित करण्यात आल्या आहेत, अशी माहिती राठोड यांनी दिली आहे.
दुसरीकडे काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी राज्य सरकार या संदर्भात दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राजस्थानमधील सुरतगढ येथे हजेरी लावणार आहे. दुसरीकडे पंजाबमध्ये २६ तर हरियाणामध्ये १७ लोकांचा स्वाईन फ्लूने बळी घेतला. स्वाईन फ्लूमुळे आतापर्यंत देशात ६३० च्या वर नागरिकांचा मृत्यू झाला.