
मुंबई : २०१५ मधील हज यात्रेसाठी औरंगाबादसह मराठवाड्यातून आतापर्यंत २६०० अर्ज दाखल करण्यात आले असून यंदा अर्ज भरण्याचीप्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविली. १९ जानेवारीपासून २० फेब्रुवारीपर्यंत अर्ज भरण्याची मुदत होती, त्यात येत्या २ मार्चपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
‘हज’ यात्रेसाठी ऑनलाईन २६०० अर्ज
दरवर्षी सुमारे ३ हजारांच्या जवळपास यात्रेकरू औरंगाबादहून हज यात्रेला जात असतात. औरंगाबादसह जालना, बीड, परभणी, नांदेड, लातूर, अहमदनगर या जिल्ह्यांत यात्रेकरू औरंगाबाद विमानतळावरून थेट जेद्दाहला रवाना होतात. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही भारतातून जाणा-या हाजींच्या कोट्यामध्ये २० टक्के कपातीचा निर्णय सौदी सरकारने घेतला आहे. या वर्षी भारतातून हज कमिटीच्या माध्यमातून १ लाख यात्रेकरू हजला जाणार आहेत. ३६ हजार यात्रेकरू खाजगी टूर ऑपरेटरच्या माध्यमातून सौदीला जाणार आहेत. या हज यात्रेसाठी १९ जानेवारीपासून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. १६ फेब्रुवारीपर्यंत २६०० अर्ज दाखल करण्यात आले आहेत. ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत २० फेब्रुवारी होती, मात्र सेंट्रल हज कमिटीने ती २ मार्चपर्यंत वाढवून दिली असल्याची माहिती हज कमिटी ऑफ इंडियाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी खालेद अरब यांनी दिली.
