
नागपूर : गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाबद्दल शैक्षणिक संस्थांनी आवड निर्माण करावी. त्याचप्रमाणे विकसित संशोधनाचा लाभ समाजाला कसा मिळेल यादृष्टीने शिक्षण पद्धतीमध्ये बदल करण्याची आवश्यकता असून कौशल्यपूर्ण प्रशिक्षित भारत हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी युवापिढीनेही पुढाकार घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
शिक्षण पद्धतीमध्ये बदल करण्याची आवश्यकता – मुख्यमंत्री
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कामठी येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या सेठ केसरीमल पोरवाल शिक्षण संस्थेच्या स्थापना दिवस तसेच कॉलेजच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याचे उद्घाटन झाले त्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे ऊजामंत्री तसेच पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे होते.
कौशल्य प्रशिक्षित मानव संसाधनाची आवश्यकता प्रतिपादीत करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शैक्षणिक संस्थांमधून गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच रोजगार कसा मिळेल यासारखे प्रश्न शिक्षणप्रणाली समोर आहेत. विद्यापीठ तसेच महाविद्यालयांनी मानांकन दर्जा मिळवित असतानाच शिक्षण, प्रशिक्षण व प्रत्यक्ष रोजगार मिळवून देणारी व्यवस्था निर्माण करण्याचे कार्य करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.
