राष्ट्रपतींचे कोळसा, विमा अध्यादेशावर शिक्कामोर्तब

pranab
नवी दिल्ली – राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी शुक्रवारी विमा क्षेत्रात थेट विदेशी गुंतवणुकीची मर्यादा २६ टक्क्यांवरून ४९ टक्क्यांपर्यंत वाढविणारे आणि कोळसा खाणवाटप पुन्हा सुरू करण्यासाठीच्या अध्यादेशावर शिक्कामोर्तब केले आहे.

१२ डिसेंबर रोजी हे विधेयक लोकसभेत मंजूर झाले. राज्यसभेत होत असलेल्या वारंवार गोंधळामुळे ते मंजूर होऊ शकले नाही. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची तातडीची बैठक झाली. त्यात विमा विधेयक व कोळसा क्षेत्रातील सुधारणांसाठी अध्यादेश जारी करण्याची परवानगी देण्यात आली. ते त्याच दिवशी राष्ट्रपतींकडे स्वाक्षरीसाठी पाठवण्यात आले होते. त्यावर आज स्वाक्षरी केल्याचे सचिव वेणू राजामोनी यांनी सांगितले

२००८ पासून राज्यसभेत विमा क्षेत्रातील परकीय गुंतवणुकीची मर्यादा वाढवण्यासंदर्भातील विधेयक प्रलंबित होते. भाजप सरकारचा पहिला अर्थसंकल्प मांडताना हे विधेयक मंजूर करण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आवाहन केले होते. जेटली यांनी हे विधेयक नव्याने संसदेच्या हिवाळी अधिवेशनात मांडले. मात्र विरोधकांच्या असहकार्यामुळे सरकारला ते मंजूर करून घेता आले नव्हते.

आता विमा क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर थेट परकीय गुंतवणुकीचा मार्ग या अध्यादेशावर राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीमुळे मोकळा झाला आहे. तर राज्य व केंद्रीय सार्वजनिक कंपन्यांना कोळसा खाणींचे थेट वाटप करण्यात येणार आहे. तसेच खाजगी कंपन्यांनाही ई-लिलावाद्वारे खाणवाटप करण्यात येणार आहे.

Leave a Comment