नागपूर – गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी मुंबईला झोपडपट्टीमुक्त करण्याला प्राधान्य देणार असून, पुढील सहा महिन्यांत मुंबईतील २०० प्रकल्पांची कामे मार्गी लावण्यात येतील, असे आश्वासन पत्रकारांशी संवाद साधताना दिले.
मुंबईला झोपडपट्टीमुक्त करणार – वायकर
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईतील झोपडपट्टीवासीयांच्या राहणीमानाचा स्तर उंचावण्यासाठी शिवशाही पुनर्वसन योजना सुरू केली होती, मात्र गेल्या १५ वर्षात राज्यात सत्तेवर असलेल्या आघाडी सरकारच्या काळात या योजनेचा मुख्य उद्देशच बाजूलाच राहिला आहे. झोपडपट्टी विकासाचे प्रकल्प गेली अनेक वर्षे रेंगाळल्याने आजही अनेक लोकांवर बेघर होण्याची वेळ आली आहे.
यापुढे गृहनिर्माण प्रकल्पात कालबद्ध कार्यक्रम राबविणार असल्याचे वायकर यांनी सांगितले. मुंबई महापालिकेने परिशिष्ठ -२ हे मंजूर केले नसल्याने १४२ एसआरए प्रकल्प रखडले असून अधिकारी विकासकांच्या साटेलोटय़ात अनेक लोकांवर बेघर होण्याची वेळ आली आहे, तर काही प्रकल्प हे गेल्या १७ वर्षापासूनही रखडले असल्याचे वायकर यांनी सांगितले.