‘स्वाभिमानी’ची मागणी; संपक-यांवर करा गुन्हे दाखल

swabhimani
नाशिक : शेतमाल व्यापा-यांनी आडत बंदीच्या निर्णयाविरोधात संप पुकारल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला असून संघटनेने संप करणा-या व्यापा-यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच शेतकरी आडत बंदीचा निर्णय मागे घेतल्यास रस्त्यावर उतरतील, असा इशाराही स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे.

बाजार समित्यामंधील गेल्या अनेक वर्षांपासून शेतमाल व्यापा-यांकडून शेतक-यांची हमाली, आडत आणि तोलाईच्या माध्यमातून लूट केली जात होती. या प्रकाराला आळा घालण्यासाठी पणन खात्याने शेतक-यांऐवजी व्यापा-यांकडून आडत वसूली करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. शेतकरी व्यापा-यांच्या जाचातून सुटका झाल्यामुळे आनंदीत झाला असतानाच आडत वसूलीच्या निर्णयाविरोधात नाशिकच्या शेतमाल व्यापा-यांनी आंदोलनाचा पवित्रा घेत संप पुकारला. त्यातच सकाळी शेतमाल घेऊन बाजार समित्यांमध्ये दाखल झालेल्या शेतक-यांची तारांबळ उडाल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक होत संप पुकारणा-या शेतमाल व्यापा-यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. तसेच व्यापा-यांच्या दबावाला बळी पडून सरकारने आडत बंदीचा निर्णय मागे घेतल्यास शेतकरी रस्त्यावर उतरतील, असा इशाराही स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे.

Leave a Comment