मुंबई: आज गारपिटग्रस्त भागाचा दौरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार असून दुपारी बाराच्या सुमारास मुख्यमंत्री गारपीटग्रस्त भागाची पहाणी करणार आहेत. अवकाळी पाऊस आणि गारपीटीने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्या पार्श्वभूमिवर हा दौरा होत असून गारपीटग्रस्तांसाठी स्पेशल पॅकेज जाहीर होणार का? याकडे गारपिटग्रस्त शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
दिंडोरी, चांदवड, आणि निफाड तालुक्यातल्या नुकसानग्रस्त भागाची मुख्यमंत्री पाहणी करणार आहेत. तर दुसरीकडे नाशिकच्या दौऱ्यावर असलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरेही गारपीटग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत.
गारपीटग्रस्तांना मदत होण्यासाठी पंचनामे योग्य पद्धतीने होण्याची गरज असल्याचेही राज ठाकरे यांनी म्हटले आहे. काल नाशिकमध्ये बोलताना राज ठाकरेंनी वेधशाळांच्या अंदाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
दोन दिवस झालेल्या या अवकाळी पावसामुळे केळी, पपई, कापूस, कांदा, डाळिंब, द्राक्ष, ज्वारी, गहू, हरभरा इत्यादी पिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. काही घरांचे पत्रे उडाल्यानं घरांची पडझड झाली आहे. शासनाने मदत केल्यावरही शेतकऱ्यांचे न भरून निघणार नुकसान या अवकाळी पावसामुळे झाले आहे.