पुणे – राज्यावर असलेले दुष्काळाचे सावट आणि दिवसेंदिवस वाढत जाणारे पाण्याचे बाष्पीभवन चिंतेचा विषय ठरल्यामुळे पुणे शहरावर पुन्हा एकदा पाणी कपातीचे संकट ओढावले असून पुणे महापालिकेला जलसंपदा खात्याने पाणी जपून वापरावे, अशा आशयाचे पत्र दिले आहे.
पुणे शहरावर पुन्हा पाणीकपातीची टांगती तलवार
पुणे शहराच्या पाण्यासोबतच शेतीच्या पाण्यावरही धरणांमधल्या पाणीसाठ्याच्या स्थितीमुळे कुर्हााड येण्याची शक्यता आहे. शहर आणि ग्रामीण भागाचे पिण्याचे पाणी आणि बाष्पीभवनाचा वेग यावर शेतीला किती पाणी द्यायचे आणि आवर्तनाचा काळ किती कमी करायचा याचा विचार जलसंपदा अधिकारी करत असून पालकमंत्र्यांची नियुक्ती झालेली नसल्याने पाणी वितरणासाठी कालवा समितीची बैठक झालेली नसल्यामुळे सध्या अधिकारी स्तरावरच खडकवासला प्रकल्पातल्या पाण्याचे नियोजन केले जात आहे. त्यामध्ये धरणसाठ्यात असलेली तूट लक्षात घेतली तर पाण्याचा वापर काटकसरीने करावा लागणार असल्याच्या निर्णयापर्यंत जलसंपदा विभाग आला आहे. तसे जर झाले तर जानेवारीपासून पुणे शहराला पुन्हा एकदा पाणीकपातीला तोंड द्यावे लागणार आहे.