मुंबई- शिवसेना नेते आमदार रामदास कदम यांनी राज्यातील सत्तेत शिवसेना सोबत येईल, चर्चा सुरू आहे, अशा प्रकारची वक्तव्ये माध्यमांमधून देऊन भाजपने शिवसेनेची फसवणूक आणि जनतेची करमणूक थांबवावी, असा इशारा भाजपला दिला आहे. भाजपने युतीसाठी कुठलाही प्रस्ताव शिवसेनेला दिला नाही. शिवसेनेला सत्तेत सहभागी करून घ्यायचे असेल तर ‘मातोश्री’वर यावे, चर्चा करावी. माध्यमांमधून ‘शिवसेना सोबत येईल’ अशी वक्तव्ये विनाकारण करून जनतेची दिशाभूल करू नये असेही कदम यांनी भाजपला बजावले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसापूर्वी दिल्लीत शिवसेना आमचा २५ वर्षापासूनचा मित्र नैसर्गिक मित्र असल्याचे सांगत शिवसेनेला सोबत घेण्याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ. राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतल्याने भाजप व आमच्या सरकारवर सोशल मिडियातून तीव्र प्रतिक्रिया आल्या आहेत त्याची दखल आम्ही घेतली आहे असे सांगत सेनेला सत्तेत घेण्याचे संकेत दिले होते. मात्र, प्रत्यक्षात भाजपकडून शिवसेनेला सत्तेत सहभागी होण्याबाबत कोणताही प्रस्ताव दिलेला नाही.