विरोधी पक्षांनी केली मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

vidhansabha
मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाराष्ट्र विधानसभेतील दोन्ही अग्निपरीक्षा पार केल्या असून त्याला विरोधीपक्ष शिवसेना आणि काँग्रेसने विरोध करत मतविभाजनाची मागणी केली. काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी सरकारने विधानसभेत पुन्हा विश्वासदर्शक ठराव मांडावा असे आवाहन राज्यपालांकडे करणार असल्याचे म्हटले आहे.

आवाजी मतदानाने विश्वासदर्शक ठराव मंजूर करण्याला काँग्रेस आणि शिवसेनेने विरोध केला होता. शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी सरकारने घटनेची पायमल्ली केल्याचा आरोप केला आहे.त्याच त्याआधी काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेच्या इतिहासात आज काळा दिवस असल्याचे म्हटले आहे.

विधानसभेत भाजपने नियम धाब्यावर बसवून, घटनेची पायमल्ली करुन विश्वासदर्शक ठराव मंजूर करुन घेतला आहे. भाजपने मतदान घेतले पाहिजे होते. विधानसभा अध्यक्षांनी पहिल्याच दिवशी नियमबाह्यरित्या काम करत आवाजी मतदान करुन लोकशाहीची हत्या केली आहे. त्यांच्या या निर्णयाचा शिवसेना धिक्कार करते, असे कदम यांनी म्हटले आहे.

Leave a Comment