मुंबई – २०१५मध्ये नाशिकच्या गोदावरी तीरावर भरणार्या कुंभमेळाव्यात चेंगराचेंगरी किंवा दहशतवादी हल्ला होऊ नये, यासाठी पुरेशी सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात यावी, अशा आशयाची जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात हिंदू जनजागृती समितीच्या वतीने दाखल करण्यात आली आहे.
२००३च्या कुंभमेळाव्यात योजनेचा अभाव आणि पुरेशा मुलभूत सुविधा नसल्यामुळे २९ यात्रेकरूंना आपला जीव गमवावा लागला होता, तर ११८ जणांना गंभीर स्वरूपाच्या जखमांना तोंड द्यावे लागले होते. दर बारा वर्षांनी येणारा कुंभमेळ्याचा उत्सव पुढील वर्षी जुलै महिन्यात सुरू होणार असून यावेळी जवळपास एक कोटी भाविक नाशिकमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. समितीने आपल्या याचिकेत, अतिरिक्त पोलिस दलांच्या तैनातीसह जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावे, अशीही विनंती केली आहे.