पाच हजार कोटींचा मुंबई-गोवा महामार्ग!

highway
मुरगांव – केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग व नौकानयन मंत्री श्री. नितीन गडकरी यांनी मुंबई-गोवा महामार्गावरील सुरळीत वाहतुकीसाठी पाच हजार कोटी रुपये खर्चून चौपदरी कॉंक्रिटिकरण करण्यात येणार असल्याची माहिती काल गोव्यात दिली. नितीन गडकरी मुरगांव पोर्ट ट्रस्टने आयोजित केलेल्या चर्चासत्राच्या समारोपप्रसंगी बोलत होते. हा महामार्ग सिमेंट कॉंक्रिटचा असणार आहे, जेणेकरून १०० वर्षे त्याची निगा करण्याची गरज भासणार नाही. देशात दरवर्षी ५ लाख अपघात रस्त्यांवर होतात. त्यातही मुंबई-गोवा महामार्गावर अपघाताचे प्रमाण जास्त आहे. त्याचे कारण कार्गो वाहतूक आहे. त्यामुळे कार्गो वाहतूक मोठ्या प्रमाणावर समुद्रमार्गे करण्यावर भर दिला जाणार असल्याचेही गडकरींनी यावेळी सांगितले. सध्या मुंबई-गोवा कार्गो वाहतूक आठवड्यातून दोन वेळा होते. हे प्रमाण भविष्यात वाढवण्यात येणार आहे.

कार्गो वाहतूक समुद्रमार्गे झाल्यास रस्त्यावरील वाहतुकीचा मोठा भार हलका होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.केंद्र सरकार जलवाहतुकीला प्राधान्यक्रम देत असून रेल्वे वाहतूक दुसर्‍या तर रस्तेवाहतूक तिसर्‍या क्रमांकावर असल्याचे गडकरी म्हणाले. सध्या देशात केवळ ०.५% जलवाहतूक आहे. इतर देशांमध्ये जलवाहतुकीचे प्रमाण २० टक्क्यांपर्यंत आहे. भारतातही आता जलवाहतुक हाच सरकारचा अग्रक्रम आहे. त्याचाच भाग म्हणून सर्व नद्या देशांतर्गत जलवाहतुकीसाठी खुल्या करण्यात येणार आहेत. मुख्य बंदरावरील मालवाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी सॅटेलाईट पोर्ट विकसीत करण्यात येणार आहेत. महाराष्ट्रात वर्धा व औरंगाबाद या ठिकाणी हे काम लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. बंदरांचा विकास करण्यासाठी बंदरांचे आधुनिकीकरण करण्यावर भर दिला जाणार आहे. त्यासाठी ई-गव्हर्नस पध्दतीचा वापर करण्यात येणार आहे. सरकार १२ बंदारांचे आधुनिकीकरण तर २५ ते ३० नवीन बंदरांची उभारणी करण्यात येणार आहे.

Leave a Comment