मुंबई – मुख्यमंत्र्यांचा शपथविधी पार पडल्यानंतर आता शिवसेना-भाजपमध्ये चर्चा सुरू झाली आहे. दोन्ही पक्षांत मंत्रिपद आणि खातेवाटपावरुन केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांच्यामार्फत चर्चा सुरू झाली असून शिवसेनेने उपमुख्यमंत्रीपदासह दहा मंत्रीपदांची मागणी केल्याची माहिती मिळत आहे.
फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाची संख्या ३०-३२ च्या आसपास असणार आहे. यात भाजपकडे १८, शिवसेनेकडे ८ तर चार घटकपक्षांना २ कॅबिनेट व ३ राज्यमंत्रीपद अशी एकूण ५ मंत्रिपदे दिले जाण्याची शक्यता भाजपमधील सूत्रांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्र विधानसभेची संख्या २८८ आहे त्यानुसार १० टक्के मंत्रिपदाचे मंत्रिमंडळ बनवायचे झाल्यास २९ जणांचा समावेश होऊ शकतो. त्यानुसारच भाजप पावले टाकत असून आपल्या सरकारची मंत्रिपदाची संख्या ३०-३२ च्या वर जाणार नाही याची काळजी घेताना दिसणार आहे.
तत्पूर्वी सन्मान मिळत नसल्याने भाजपाप्रणित सरकारच्या शपथविधी सोहळ्यावर बहिष्कार टाकणा-या शिवसेनेने नरमाईची भूमिका घेत उद्धव ठाकरेंनी शपथविधी सोहळ्याला हजेरी लावली होती. दरम्यान त्यानंतर उद्धव ठाकरे व भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यात वानखेडे स्टेडियममध्ये बैठकही झाली, ज्यात शिवसेनेच्या पाठिंब्याविषयीही चर्चा झाली.