
मुंबई – ज्या मुंबईत उच्च शिक्षण घेण्यासाठी देश-विदेशातून विद्यार्थी येतात त्या मुंबईने शिक्षणात ’ढ’ असेलेल्या उमेदवारांना आमदार बनवले आहे. मुंबईतील निम्मे नवनिर्वाचित आमदार जेमतेम दहावीपर्यंतच शिकलेले असून चांदिवली मतदारसंघातून निवडून आलेले नसीम खान यांनी तर प्राथमिक शिक्षणानंतरच शाळेला रामराम केलेला आहे. उमेदवारांनी आपल्या उमेदवारी अर्जासोबत जे प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे त्यातून ही माहिती समोर आली आहे. गोरेगावमध्ये शिवसेनेचे गटनेते सुभाष देसाई यांच्यासारख्या तगड्या उमेदवाराला हरवून ’जायंट किलर’ ठरलेल्या भाजपच्या उमेदवार विद्या ठाकूर या केवळ आठवी शिकलेल्या आहेत. माजी उपमहापौर राहिलेल्या ठाकूर यांनी व्यवसायाच्या कॉलममध्ये गृहिणी असा उल्लेख केला आहे तर पती डेव्हलपर असल्याचेही त्यांच्या प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे. अणुशक्तीनगरचे शिवसेनेचे आमदार तुकाराम काते नववी नापास असून, त्यांनी आपण शेतकरी असल्याचं म्हटलंय. मुलुंड मतदारसंघातून पुन्हा एकदा निवडून आलेले भाजपचे सरदार तारासिंह हे दहावी नापास आहेत. आपण व्यावसायिक असल्याचं त्यांनी म्हटलंय. अंधेरी पूर्वमधून शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आलेल्या रमेश लटके यांचे शिक्षण दहावीपर्यंतच झालं आहे. दहावी पास लटके हेही व्यावसायिक आहेत. घाटकोपर पूर्व मतदारसंघातून निवडून आलेले भाजपचे आमदार प्रकाश मेहता, चेंबूरचे शिवसेनेचे आमदार प्रकाश फातर्फेकर, कलिना मतदारसंघातून कृपाशंकर सिंह यांना धूळ चारणारे शिवसेनेचे संजय पोतनीस यांनीही दहावीनंतर शाळा सोडलेली आहे. मेहता यांनी राजकारण हाच आपला व्यवसाय असल्याचं नमूद केलंय तर फातर्फेकर यांचा केबल नेटवर्किंगचा आणि पोतनीस यांचा कन्सल्टन्सीचा व्यवसाय आहे. कुर्ला मतदारसंघातून निवडून आलेले शिवसेनेचे आमदार मंगेश कुडाळकर यांचं शिक्षणही दहावीपर्यंतच झालं आहे.
