दलित कुटुंबातील तिघांची निर्घुण हत्या

murder
अहमदनगर – दलित कुटुंबातील तिघांची हत्या करण्यात आल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात घडली असून जवखडे खालसा या गावातील जाधव वस्तीत झालेल्या या घटनेत आई, वडील आणि तरुण मुलगा यांचे तुकडे करून मृतदेह विहिरीत टाकण्यात आले आहेत. या हत्येमागे कुणाचा हात आहे, तसेच हत्येचे कारण समजू शकलेले नाही.

संजय जगन्नाथ जाधव (४२), जयश्री संजय जाधव (३८) व सुनील संजय जाधव (१९) हे जवखडे खालसा या गावात राहत होते. जाधव यांची गावाजवळ शेती असून त्यांचे घरही शेतातच आहे. सुनील हा मुंबईत नोकरी करतो. आठ दिवसांपूर्वीच तो गावी आला होता. मंगळवारी सकाळी त्यांच्या घराचा दरवाजा उघडा दिसला तसेच घरातही कोणी नसल्याने त्यांच्या शेतात काम करणा-यांनी जाधव यांच्या नातेवाईकांना कळवले. नातेवाईकांनी घरात येऊन पाहणी केली असता घराच्या ओटयावर थोडेसे रक्त सांडलेले होते. त्यामुळे नातवाईक आणि ग्रामस्थांनी जाधव कुटुंबीयांचा शोध सुरू केला.

वस्तीपासून जवळच असलेल्या एका जुनाट, पडिक विहिरीत सायंकाळी त्यांच्या मृतदेहांचे तुकडे आढळून आले. त्यानंतर त्याची माहिती पाथर्डी पोलिसांना देण्यात आली. पाथर्डी पोलिस घटनास्थळी गेले असता वरिष्ठ पोलिस अधिकारी आल्याशिवाय मृतदेहांचा पंचनामा करून दिला जाणार नाही, अशी भूमिका संतप्त झालेल्या नागरिकांनी घेतली.

Leave a Comment