
मुंबई – काल महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून या निकालांमध्ये काही धक्कादायक पराभवांबरोबरच काही धक्कादायक विजयही नोंदवले गेले. यात सर्वात धक्कादायक विजय ठरला तो ऑल इंडिया मजलिसे-इत्तेहादूल-मुसलमीन म्हणजे एमआयएमचा.
एमआयएमचा महाराष्ट्रात प्रवेश चिंताजनक
राज्यात एमआयएमने दोन जागा जिंकून महाराष्ट्र विधानसभेत चंचूप्रवेश केला असून कट्टरतावादी विचारांना खतपाणी घालणा-या एमआयएमचा विजय हा प्रस्थापित राजकीय पक्षांसाठी एक धक्का मानला जात आहे. कारण भविष्यात या पक्षाकडे अधिकाधिक मुस्लिम मतदार आकर्षित झाले तर, भविष्यात महाराष्ट्रातील राजकरण वेगळया दिशेने जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दक्षिण मुंबईत भायखळा आणि औरंगाबाद मध्य या शहरीभागातील मुस्लिम बहुल वस्तीमधून एमआयएमने दोन जागा जिंकल्या. भायखळा विधानसभा मतदारसंघातून वारीस युसुफ पठाण तर, औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघातून सय्यद जलिल निवडून आले. भायखळयातून वारीस पठाण यांनी निसटता विजय मिळवला मात्र औरंगाबादमध्य मधून सय्यद जलिल यांनी प्रतिस्पर्धी उमेदवाराचा वीसहजार पेक्षा जास्त मतांनी पराभव केला.
