ठाणे – ठाणे गुन्हे शाखेच्या वागळे परिमंडळाने अंबरनाथ येथील एका पोल्ट्री फार्मवर छापा मारून १० टन वजनाचे ७ कोटींचे बेकायदा रक्तचंदनाचा साठा हस्तगत केला आहे. मात्र चंदन तस्करांची टोळी फरार झाली असून पोलिसांनी पोल्ट्रीमालक राजेश कोठावळे याला अटक केली आहे.
अंबरनाथ तालुक्यातील चिरडगाव येथे कोठावळे याची पोल्ट्री फार्म आहे. मात्र येथे कोंबड्यांची पैदास न करता अवैध व्यवसाय सुरु असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक शहाजी जाधव यांच्या पथकाने फार्मवर धाड टाकून रिकाम्या फार्ममध्ये ९ टन ६५० किलो ग्राम वजनाचे रक्तचंदनाचे ओंडके जप्त केले. आंतरराष्ट्रीय बाजारात याची किंमत ७ कोटी आहे. याप्रकरणी पोलिसांनी पोल्ट्री मालक कोठावळे यांना अटक केली असून या तस्करीतील अन्य दोघांचा शोध सुरु आहे.