नव्या सरकारमध्ये राष्ट्रवादीची प्रमुख भूमिका – प्रफुल्ल पटेल

praful-patel
मुंबई – राष्ट्रवादीचे नेते व खासदार प्रफुल्ल पटेल यांनी आज एक टि्वट करून, महाराष्ट्रातील येऊ घातलेले नवे सरकार बनविण्यात राष्ट्रवादीची प्रमुख भूमिका असेल असे म्हटले असून या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला चांगले यश मिळेल असेही पटेल यांनी त्यात म्हटले आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळेल असे वेगवेगळ्या वाहिन्यांनी व संस्थांनी सादर केलेल्या एक्झिट पोलमध्ये म्हटले आहे. तर, दोन-तीन संस्थांनी राज्यात कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार नसल्याचे भाकीत वर्तविले आहे. त्यामुळे राजकीय पक्षही बुधवारी झालेल्या मतदानाची आकडेवारी घेऊन उमेदवारांकडून माहिती घेत आहेत.

विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी मतदान झाल्यानंतर आता रविवारकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यातील मतदारांनी आपला कौल कोणाच्या बाजूने दिला ते निकालानंतरच स्पष्ट होणार आहेत. मात्र आपल्या पक्षाला किती जागा मिळतील याची माहिती घेण्यास पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी सुरुवात केली आहे. मात्र विविध एक्झिट पोलमध्ये भाजप राज्यातील सर्वांत मोठा पक्ष असेल असे निष्कर्ष काढले आहेत. काहींनी भाजपच्या नेतृत्त्वाखाली युतीला स्पष्ट बहुमत मिळेल असा अंदाज वर्तविला आहे तर काहींनी भाजपला स्पष्ट बहुमत मिळणार नसल्याचे म्हटले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पटेल यांनी आज केलेल्या टि्वटमुळे राजकीय वर्तुळात महत्त्व प्राप्त झाले आहे.

Leave a Comment