मुंबई – महाराष्ट्रात शिवसेनेबरोबरची २५ वर्षांची युती तोडल्यानंतर आता भाजपने पंजाबात अकाली शिरोमणी दलाबरोबर असलेली युतीही संपुष्टात आणण्याचे संदेश दिले आहेत. सेनेबरोबरची युती तोडण्यापूर्वी बिहारमध्ये भाजपने जेडीयूशीही फारकत घेतली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरीष्ठ नेत्यांकडून अकालींना बायबाय केले जाणार असल्याचे संकेत दिले गेले आहेत. दरम्यान हरियाना अकालींविरोधात प्रचारात उतरलेल्या नवज्योतसिंग सिद्धू यांची वाय दर्जाची सुरक्षा पंजाब सरकारने काढून घेतली आहे.
गेल्या कांही दिवसातील घडामोडी पाहता अकाली दल आणि भाजप यांचा काडीमोड होणार हे स्पष्ट होत होतेच. हरियानात अकाली दलाने भाजपविरोधात बंडखोर उभे केल्यानंतर भाजप फारच दुखावला गेला होता. त्यातूनच पंजाबचे प्रदेशाध्यक्ष कमल शर्मा यांना बाजूला करून अकाली विरोधात बोलणारे नवज्योतसिंग सिद्धू यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद सोपविले होते. दुसरीकडे अकाली शिरोमणीचे नेते सुखबिरसिंग बादल यांनी संघटना मजबूतीसाठी प्रयत्न सुरू केले तर मोदी सरकारने पंजाब भाजप कार्यकर्त्यांना स्वबळावर निवडणूक लढण्याच्या दृष्टीने तयार राहण्याचे आदेश दिले आहेत.