दिल्ली – प्राण्यांवर टेस्ट करून बनविली जात असलेली सौंदर्यप्रसाधने आयात करण्यावर भारत सरकारने बंदी घातली असून असा नियम करणारा दक्षिण आशियाच्या क्रूएल्टी फ्री कॉस्मेटिक झोन मधला भारत हा पहिला देश बनला आहे. अशी प्रसाधने बनविण्यावर देशात अनेक महिन्यांपूर्वीच बंदी घातली गेली होती आणि या सौदर्यप्रसाधनांच्या आयातीवरही बंदी घातली गेली आहे.
ह्युमन सोसायटी इंटरनॅशनल या एनजीओतर्फे ही मोहिम जगभर चालविली जात आहे. त्याला प्रतिसाद देताना भारत सरकारने औषध व सौंदर्य प्रसाधने नियमात नवीन नियम १३५ बी समाविष्ट केला आहे. त्यानुसार ही आयातबंदी घातली गेली असून ती १३ नोव्हेंबरपासून लागू होणार आहे. ह्युमन सोसायटीने हे त्यांच्या मोहिमेतील मोठे यश असल्याचे व सरकार, ग्राहक आणि या क्षेत्रातील उद्योग यांच्या सहकार्याशिवाय हे शक्य झाले नसते अशा भावना व्यक्त केल्या आहेत. हाच नियम प्राण्यांचा वापर केला जात असलेल्या अन्य उत्पादनांसाठीही लागू केला जावा यासाठीही प्रयत्न केले जात आहेत.
पेटा सायन्स पॉलीसी अॅडव्हायझर डॉ.चैतन्य कोडुरी यांनी नवीन नियम म्हणजे भारताच्या सुरक्षित विज्ञान आधुनिकीकरणातील संस्मरणीय क्षण असल्याचे मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले आज अनेक उत्पादनांच्या चाचण्यासाठी जगभरात लक्षावधी निरपराध प्राणी दुःख यातना भोगत आहेत. अशा प्रकारे नवा नियम करून भारताने शांपू, मस्कारा, लिपस्टिक वा अन्य सौदर्य प्रसाधनांच्या टेस्टींगसाठी मुक्या प्राण्यांचा आंधळा वापर भारत सहन करणार नाही असा संदेशच जगाला दिला आहे.