चिंताजनक नाही औद्योगिक उत्पन्न वाढीची आकडेवारी

nirmala-sitharaman
मुंबई – अन्य काही क्षेत्रांमध्ये विस्तार होण्याची चिन्हे असल्यामुळे ऑगस्ट महिन्याताली औद्योगिक उत्पादन वाढीच्या सूचकांकाची आकडेवारी चिंताजनक नसल्याचे मत वाणिज्य आणि उद्योग राज्य मंत्री निर्मला सीतारमन यांनी व्यक्त केले आहे. ऑगस्ट महिन्यात औद्योगिक उत्पादन वाढीच्या दराने मागील पाच महिन्यातील निच्चांकी स्तर गाठला आहे. याबाबतीत बोलताना सीतारामन म्हणाल्या की, नव्या सरकारने मागील काही महिन्यांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी अनेक संभाव्य पाऊले उचलली. सरकारतर्फे व्यवासय करण्यासाठीची प्रक्रिया सोपी करणे, नव्या उपयुक्त नियमांची निर्मिती प्रक्रिया जलद करणे यांसारखे अनेक प्रयत्न सुरु केले आहेत. जर यापैकी एकही गोष्ट झाली नसती तर स्टॅंडर्ड एँड पूअर्स सारख्या जागतिक संस्थेने भारताचे पतमानांकन वाढविले नसते. देशातील वाहन आणि अन्य काही प्रमुख क्षेत्रांमध्ये चांगल्या कामगिरीचे चिन्हे आहेत, असे देखील त्यांनी सांगितले. भारताच्या विविध भागीदार देशांबरोबर झालेल्या मुक्त व्यापार कराराचे (एफटीए) पुनरावलोकन पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. या कराराचा फायदा घरगुती उत्पादकांना होणार असल्याचे देखील यावेळी सीतारमन यांनी सांगितले. त्या म्हणाल्या की, आम्ही एफटीएच्या बरोबरीनेच विशेष आर्थिक क्षेत्राचे (सेझ) देखील पुनरावलोकन केले आहे आणि ही प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आहे. याशिवाय देशाचे नवीन विदेश व्यापार धोरण लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे देखील यावेळी सीतारमन यांनी सांगितले.