तर सीमेवरील तणाव वाढला नसता : पी चिदंबरम

chidambram
मुंबई – केंद्रातील मोदी सरकारमध्ये एकाच मंत्र्याकडे अर्थ आणि संरक्षण यांसारखी दोन महत्वाची खाती सोपविण्यात आलेली आहे. देशाला जर पूर्णवेळ संरक्षण मंत्री असता तर सीमेवर तणाव वाढला नसता, असे मत माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी आज मुंबईत व्यक्त केले. केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांना संरक्षण मंत्रालयापेक्षा अर्थ मंत्रालयातच अधिक रस असल्याचेही ते म्हणाले. विधानसभा प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात पी. चिदंबरम मुंबईत प्रचारासाठी आले होते. यावेळी मोदी सरकारची गेल्या १४० दिवसांची कामगिरी, विविध धोरणे, खासकरून अर्थविषयक धोरणांवर त्यांनी भाष्य केले. गेल्या १५ वर्षात महाराष्ट्राने अनेक क्षेत्रांमध्ये प्रगती केली असून महाराष्ट्र राज्य हे गुजरातपेक्षा कितीतरी पुढे असल्याचे रघुराम राजन समितीच्या अहवालात म्हटले असल्याचे ते म्हणाले. ते पुढे म्हणाले की, केंद्रातील एनडीए सरकार आधीच्या यूपीए सरकारच्या योजनांचे नाव बदलून जुन्याच योजना जाहीर करण्याचा सपाटा चालवला असून महागाईवर नियंत्रण मिळविण्यासाठी कोणत्याही प्रकारची उपाययोजना अद्याप केली नसल्याची टीका देखील चिदंबरम यांनी केली.

यूपीएच्या आर्थिक धोरणांमुळे एप्रिल-जून या तिमाहीत विकास दर ५.७ टक्के राहिला होता. मात्र मोदी सरकारने याचे श्रेय यूपीएला दिला नाही. सध्या अर्थव्यवस्थेच्या वाढीला पोषक वातावरण असून दुसऱ्या तिमाहीच्या आकडेवारीवरून खरी आर्थिक परिस्थिती कळेल, असे देखील चिदंबरम यांनी यावेळी नमूद केले.

Leave a Comment