टीम इंडियाची मालिकेत बरोबरी

team-india
नवी दिल्ली – भारतीय संघाने शनिवारी वेस्ट इंडीजचा सामनावीर मो. शमी (४/३२), रवींद्र जडेजा (३/४४) आणि अमित मिश्रा (२/४०) यांनी केलेल्या धारदार गोलंदाजीच्या बळावर दुस-या एकदिवसीय सामन्यात ४८ धावांनी पराभव केला. यासह भारताने पाच वनडे सामन्यांच्या मालिकेत १-१ ने बरोबरी साधली. आता मालिकेतील तिसरा वनडे १४ ऑक्टोबर रोजी विशाखापट्टणम येथे होईल. कोची येथील सलामी सामन्यात भारताला पराभवाला सामोरे जावे लागले होते. दुस-या वनडेत विंडीजला नमवून भारताने विजयी ट्रॅकवर आल्याचे संकेत दिले.

दीर्घ प्रतीक्षेनंतर फॉर्मात आलेला विराट कोहली (६२) आणि सुरेश रैना (६२) यांच्या शानदार शतकी भागीदारीच्या भारताने सात गड्यांच्या मोबदल्यात २६३ धावांची खेळी केली. प्रत्युत्तरात पाहुण्या विंडीजने ४६.३ षटकांत २१५ धावा करून आपला गाशा गुंडाळला.

स्मिथची झुंज व्यर्थ : विंडीजकडून सलामीवीर स्मिथने एकाकी झुंज दिली. त्याने सलामीवीर डॅरेन ब्राव्होसोबत (२६) संघाला ६४ धावांच्या भागीदारीची सलामी दिली. दरम्यान, ब्राव्होला त्रिफळाचीत करून मो. शमीने ही जोडी फोडली. त्यानंतर स्मिथने तिस-या क्रमांकावर आलेल्या पोलार्डसोबत संघाचा डाव सावरला. या दोघांनी दुस-या गड्यासाठी ७२ धावांची भागीदारी करून संघाच्या विजयाचा दावा मजबूत केला. दरम्यान, शमीने स्मिथला बाद करून विंडीजच्या विजयाच्या प्रयत्नावर पाणी फेरले. स्मिथने ९७ चेंडूंचा सामना करताना ११ चौकार आणि दोन षटकारांच्या साहाय्याने संघाकडून सर्वाधिक ९७ धावा काढल्या.

Leave a Comment