यवतमाळ – भाजपला याआधी कधीही शिवछत्रपती शिवाजी महाराज आठवले नाहीत. त्यांच्या नावाचा उल्लेख करून मताचा जोगवा मागत आहे, तर नरेंद्र मोदी हे अमेरिकेतील भाषणाचा प्रचारात उल्लेख करीत आहेत. हे कितपत योग्य, असाही प्रतिप्रश्न काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केला. राज्यात काँग्रेस बहुमतात येईल, निवडणुकीत वेग आला असून, राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी आदींच्या सभा मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. लोकसभा निवडणूक संपताच नरेंद्र मोदींची लाट ओसरली, त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचा दारुण पराभव झाला. महाराष्ट्रात भाजपची पीछेहाट होत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाणीव होताच त्यांनी महाराष्ट्रात मोठ्या सभा घेण्याचा सपाटा सुरू केल्याचेही यावेळी ठाकरे यांनी सांगितले. गोपीनाथ मुंडे यांचे अपघाती निधन झाल्याचा निकाल घाईने दिल्यामुळे पुन्हा या प्रकरणाची चौकशीची मागणी आम्ही करणार असल्याचे ते म्हणाले.