मुंबई- समृद्ध महाराष्ट्राची हमी देणारा ‘दृष्टीपत्र’ नावाचा जाहीरनामा भाजपने आज प्रकाशित केला. पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विनय सहस्त्रबुद्धे, मुख्य प्रवक्ते माधव भंडारी, केशव उपाध्ये आदी उपस्थित होते. भाजपच्या जाहीरनाम्यातून वेगळ्या विदर्भाचा मुद्दा गायब झाला आहे.
या जाहीरनाम्यात श्रमिक पत्रकारांना १५०० रूपये पेन्शन, वृद्धापकाळात अन्नदाता पेन्शन, ६० वर्षांपुढील महिलांसाठी माहेरचा आधार पेन्शन योजना, आयटी उद्योग प्राधिकरणाची स्थापना, मुंबईतील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम पाच वर्षात पूर्ण करणार, रोजगार हमी योजनेत सुधारणा करून शेतातील अंतर्गत रस्त्यांचे जाळे निर्माण करणे, पेट्रोल आणि डिझेलचे दर नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न अशी अनेक आश्वासने देण्यात आली आहे.
दरम्यान, वेगण्या विदर्भाचा मुद्दा वगळल्यामुळे वारंवार वेगळया विदर्भासाठी आग्रही भूमिका मांडणाऱया गडकरी आणि फडणवीस यांना ऐन विधानसभा निवडणुकीत तोंडघशी पडण्याची वेळ आली. मात्र, वेगळया विदर्भाच्या मागणीवर भाजपा ठाम असल्याचे भाजपाच्या नेत्यांकडून सांगण्यात आल्याने भाजपाची दुटप्पी भूमिका पुन्हा एकदा समोर आली आहे.