
वर्धा – जो महाराष्ट्र प्रत्येक बाबतीत पहिल्या क्रमांकावर होता त्याला काँग्रेसने १५ वर्षात कुठे नेऊन ठेवला, असा सवाल करून भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीवर टीका केली. पुलगाव येथे भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत शहा बोलत होते काँग्रेस आघाडीवर तोफ डागताना शाह म्हणाले की, या सरकारने सिंचन, सहकार, शेती, उद्योग या सर्वच बाबतीत आघाडीवर असलेल्या महाराष्ट्राला रसातळाला नेऊन ठेवले आहे. देशातील आघाडीवर असणारा महाराष्ट्र आज कुठे आहे, अशी विचारायची सोय नाही. महाराष्ट्राला सुजमाल सुफलाम करण्यासाठी बहुमताने भाजपचे सरकार निवडून आणा, असे आवाहन त्यांनी केले.काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी विचारतात की १०० दिवसात काय केले? ६० महिन्यानंतर संपूर्ण हिशोबासह देशाला सामोरे जाऊ. काश्मीर हे भारताचे अविभाज्य अंग असून त्याबाबत कुणीही चिंता करू नये. पाकिस्तानने सध्या सुरु केलेल्या कुरापतींना सडेतोड उत्तर देऊ असे त्यांनी सांगितले.
