नवी दिल्ली – सर्वात तरूण अब्जाधीश आणि फेसबुकचा बादशहा अशी ओळख असलेला मार्क झुकेरबर्ग सध्या भारताच्या दौऱ्यावर आहेत. “भारत हा प्रचंड प्रगतीची क्षमता असलेला देश आहे. हे मोठ्या महत्त्वाकांक्षांचे स्थान आहे व फेसबुक यासंदर्भात कटिबद्ध आहे. त्यामुळे फेसबुकसारख्या समुहसंपर्क माध्यमाच्या वाढत्या प्रसारासाठी भारतात पोषण वातावरण आहे, असे आज झुकेरबर्ग यांनी म्हटले आहे. ‘इंटरनेट डॉट ऑर्ग’ या परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले.
फेसबुकच्या प्रसारासाठी भारतात पोषक वातावरण
झुकेरबर्ग हे या भारत दौऱ्यामध्ये देशातील सर्व गावे माहिती तंत्रज्ञानाच्या सहाय्याने जोडण्याच्या संवेदनशील विषयासंदर्भात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर चर्चा करणार आहेत. झुकेरबर्ग यांची ही पहिलीच भारत भेट आहे. ‘डिजिटल इंडिया‘ या केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेसंदर्भात मदत करण्यासाठी आपण अत्यंत उत्सुक असल्याची भावना झुकेरबर्ग यांनी यावेळी व्यक्त केली. देशामधील सर्व गावांना इंटरनेटच्या माध्यमातून जोडण्यासाठी भारताचे पंतप्रधान प्रयत्नशील आहेत व फेसबुक त्यांना मदत करण्यासाठी उत्सुक आहे,‘‘ असे झुकेरबर्ग म्हणाले.
‘भारतामध्ये २० कोटींपेक्षा जास्त नागरिक इंटरनेट वापरतात व फेसबुक वापरणाऱ्यांची संख्या १० कोटींपेक्षाही जास्त आहे. मात्र देशामध्ये अजून अब्जावधी नागरिक इंटरनेट वापरत नसल्याचे,‘ निरीक्षण झुकेरबर्ग यांनी यावेळी नोंदविले.